Thursday, 28 December 2017

तुझ्या डोळ्यातले पाहून ऋतू

तुझ्या डोळ्यातले पाहून ऋतू
कळली आहेस मला तू

खुललेला चेहरा ,
गुलाबी हसू
निसर्गाने पांघरलेलं
सुंदर रूपच जणू
पाहून डोळ्यातला
निरागस आनंदी ऋतू
अनुभवतो मी सुंदरसा
वसंत ऋतूचा बहर तू

मनातून हळवी
आहेस जराशी तू
मनातल्या नात्यांचा ओलावा
डोळ्यात लागतो दिसू
ज्या क्षणी व्यक्त होतेस
डोळ्याच्या ओल्या पापण्यातून तू
भासतो  त्यावेळी वर्षा
ऋतूतील हळवासा नभ तू

नाकावरचा राग तुझा
जेंव्हा लागतो मला कळू
तेंव्हा कळत नाही
राग तुझा कसा मी शमवू?
कळत नाही डोळ्यातला
तो वणवा कसा शांत मी करू?
जाणवतेस तेंव्हा ग्रीष्म ऋतूतला
सतत वाढणारा पारा तू

दूर जाताना वाटते भीती
कुठे तरी आपण हरवू
आयुष्य भासे तेंव्हा
रुक्ष निसर्गच जणू
तेंव्हा डोळ्यातले भाव तुझे
सांगतात इथेच थांबू
पण दूर असताना ही आठवून
ते भाव दिसे शरद ऋतूची पौर्णिमा तू

जेंव्हा कधी मी चिडतो
पाहतो तुला रागावू
तेंव्हा तुझ्या शब्दांच्या गारव्याने
राग लागतो माझा निवळू
डोळ्यातला तो थंडपणा
जरा दे मला अनुभवू
आठवू दे थंड असा हेमंत-शिशिर ऋतू

तुझ्या डोळ्यातले पाहून ऋतू
खरचं नव्याने उलगडली आहेस मला तू....

                                                    -----नितीन खंडारे






Thursday, 21 December 2017

नजर

नजरे नजरेत फरक
असतो फार
कोणाला माधुरी तर कोणाला
आवडते दुसरी नार
कोणासाठी कोणी देव तर कोणासाठी
तोच दानवाचा अवतार
विचारांच्या चष्म्यातून ह्या
समजून घ्या जगाचा हा सार
चष्म्याविना त्या नाही कळणार
समजणार हा संसार
म्हणून बुद्धीच्या कसोटीवर जाणून घ्या
प्रत्येक प्रश्न अन विचार
सापडेल तुम्हाला मार्ग नवी, दिसेल चष्म्यातून
पारदर्शक अन स्वच्छ विचारांची खाण
आणि हो जगाला सामोरे जाताना
वापरा नक्की हे गवसलेले ज्ञान
जे करेल रोजच्या जीवनातील
अडचणींची नौका पार
                   ---- नितीन खंडारे

प्रेम

पृथ्वी आणि चंद्र असले जरी दूर
तरी बांधली आहे त्यांची गाठ
गुरुत्वाकर्षणाच्या नाजूक बंधनावर 

तसेच,
नकळत बांधले गेलेत आपले सूर
धडधड करणाऱ्या हृदयात
प्रेमाच्या मधुर ठेक्यावर 

म्हणतो आइनस्टाइन ,
प्रेमात पडायला गुरुत्वाकर्षण
नसतो जबाबदार 
मग प्रश्न पडतो की प्रेमात पडतो कसे ?
कसे जुळतात हे तार?

नंतर कळले उलगडले
हे गणित मला हळूवार
कळले प्रेमात पडायला कारणीभूत आहे
फक्त तुझ्या एका कटाक्ष नजरेची धार

                                           ----नितीन खंडारे




Tuesday, 19 December 2017

पाण्यासारख मन

बर्फासारखं एकाजागी जमून
थांबायचंय नाही मला

मनाचा झालेला बर्फ वितळवून
पाण्यासारखं खळखळ वाहायचंय मला

मनाचं गढूळ डबक बनून साचणं
जमणार नाही कधी या मनाला

डोंगर दऱ्या खोऱ्या पालथ्या घालतं
फक्त पुढे पुढेच चालायचंय मला

हिंडायचंय हे जग , अनुभवायचं रोज
माझ्यातला मी नव्याने मला

आणि शेवटी खाऱ्या समुद्राला भेटून
गोड मनाने गोड बनवायचंय त्याला
---- नितीन खंडारे

Saturday, 16 December 2017

जगणं शिकतोय तुला पाहून

जगण्यातला आनंदच
बसलो होतो मी गमावून
पण आता जगणं नव्याने
शिकतोय मी तुला पाहून

मस्ती, धिंगाणा, पागलपंती
गेलोच होतो मी विसरून
पण आठवलं ते सगळं
तुझा मॅडनेस अनुभवून

रोजचंच होत ते जगणं
मन स्वतःच मारून
पण जगायचं कसं सांगितलं
तू ते प्रत्यक्षात दाखवून

जगण्यातला बिनधास्त पणा
जाणवला मला तुझ्यातून
जगणं कसं सुंदर असावं
ते दिसलं मला त्यातून

रस्ता मी भटकलो भरपूर
जीवनाचा खरा आनंद सोडून
भटकता भटकता सापडला
मला नकळतच तुझ्या रूपातून

कृत्रिम जगात जगत होतो मी
जगण्याचा खरा अर्थ हरवून
दिसला तुझ्या डिकशनरीत तो
सांग अर्थ त्याचा कधीतरी
मला समजावून

                                                      --- नितीन खंडारे

Friday, 8 December 2017

दे जरा इकडे चष्मा तुझा

गुगल सारखं
तुझ्या मनावरचं पेज
चष्मा तुझा
शोधेल का गं जरा ?

दे जरा इकडे
चष्मा तुझा
पाहू दे त्यातून
काय दिसतंय का मला ?

रोजची तुझी धावपळ
घर आणि ऑफिस अशी पळापळ
दमछाक तुझी त्यातून
कळते का मला ?

गर्दीने तुंबलेली लोकल
तुझा दगदगीचा प्रवास
त्यात गुदमरलेला श्वास
तो श्वास समजेल का मला ?

अन दिवसाच्या शेवटी
घरची तीच कामं
थकवा ,कंटाळा आला तरी
जमेल का गं मला ?

कधी दुखावलं असेलं
भावूक मन तुझं
तेंव्हा त्या निघालेल्या अश्रूंना
त्या चष्म्यातून प्लीज अनुभवू दे मला

चांगलं की वाईट कशी ठरवते तू
समोरच्या व्यक्तीला
चष्म्यातून तुझ्या
तू पाहू देशील का मला ?

डोळ्यातला आनंदीपणा
तुझा खोडकर पणा
यार , दिसेल का
तुझ्या चष्म्यातून मला ?

डोळ्यात तुझ्या
प्रेमाची ती सावली
यार ,ओळखता येईल का
तुझ्या चष्म्यातून मला ?

तुझ्या मनावरचे स्टेट्स
नसेल प्रोब्लेम तुला तर
त्या चष्म्यातून
वाचू का मी जरा ?

कदाचित लपलेलं
तुझ्या नजरेतलं माझं स्टेट्स
त्या चष्म्यातून
पूर्ण आणि स्पष्ट दिसेल ना मला

दे जरा इकडे
चष्मा तुझा
पाहू दे तुझ्या नजरेतून
हे सगळं जग मला
                                           -----नितीन खंडारे


















Thursday, 7 December 2017

ऐकणा तू जराशी

ऐकणा तू जराशी
रुसू नकोस
बोलना तू माझ्याशी
मन मोकळ होत
फक्त तुझ्यापाशीच
म्हणून बोलना
बोलू मी कोणाशी ?
कानमंत्र देणा मला
कसं वागू मी तुझ्याशी ?
माहित आहे तुझा राग क्षणभरचा
साखर पाण्यात विरघळते जशी
पण धीर संपत चालला माझा
शब्द आणणा तू ओठाशी
नाही बोलायचं कधीच
असं ठरवलंय का तू मनाशी ?
असेल तरी विसर राग
नसेल तर बोलना तू जराशी
ए ,ऐकणा तू जराशी
                                           ----नितीन खंडारे
 

रंग तुझा

अवखळ नदीचा
रंग निळा तू
हिरवा रंग नसात
तुझ्या संगिनी
ढग काळे गुंतवते
केसामध्ये तू
त्या काळ्या डोळ्यात
तुझ्या हरवलो मी
आहेस पिवळ्या
सोन्यासारखी मनाची तू
पण रागवताना दिसतो
तुझ्यात लाल रंगाची लाली
आहेस शुभ्र मनमिळावू
मनाची तू
जशी भासतेस सगळे सात रंग
सामावले तुझ्यातचं सखी
                                        ----नितीन खंडारे 

Monday, 27 November 2017

काय हवे आहे तुला ?

पाठ फिरवुनी पाठ दाखवणे
तुझे पाठ आहे मला
एकदा तरी सांग सखे
काय हवे आहे तुला ?

गोड आहे रुसवा फुगवा
तुझा पण सोड हा अबोला
नाकावरचा राग विसरून
एकदा बोल ना गं तू जरा

मन मोकळ कर तुझं सखे
बोलू दे तुझ्या या मनाला
कळतंय तुझं मन पण कळू दे
अजून काय गुन्हा मी केला ?

प्रेमाचा असेल तो गुन्हा तर
नकळतच आपल्यातचं घडला
पण प्रेमाची शिक्षा प्रेमच
सखे इलाज नाही त्याला

जेंव्हा हे बोललो तेंव्हा
सुंदर निरागस हसू आलं तुला
बस आयुष्यभर तुझ्या ओठावर
हेच हसू रहाव असचं वाटत  मला
                                                  ----नितीन खंडारे


Wednesday, 22 November 2017

सांग ना तू मला

प्रेम म्हणजे काय असतं ?
कळलं नाही अजूनही मला
कसं ,केंव्हा अन कुठेही होतं
असेल माहित तर हे सांग ना तू जरा

मिठीत घेवून व्यक्त करणं की
दूर राहून ही व्यक्त होणं
हे प्रेम कसं व्यक्त होतं ?
व्यक्त हो,अन सांग ना तू मला

रोज रोज भेटणं की
न भेटता ही एकमेकांना ओळखणं
हे प्रेम कसं ओळखायचं ?
ओळख अन सांग ना तू मला

तुझ्या सेल्फीतल्या फोटोला पाहतचं राहणं की
प्रत्यक्ष तू असताना ही न पाहुनी तुला पाहणं
ते प्रेमातलं  पाहणं कसं असतं ?
जरा वळूनी पाहून सांग ना तू मला

फोटो मधली मधाळ तू की
प्रत्याक्षातली हळवी , मनमिळावू तू
यातली नक्की आहेस तू कशी ?
मन मोकळेपणाने सांग ना तू मला

ग्रुप वर बोलणारी तू की
दोघात न बोलता खूप काही बोलून जाणारी तू
हे प्रेम कसं बोलतं  ?
एकदा बोलून सांग ना तू मला

WHATSAPP वर भेटणारी तू की
सहज नकळतचं वाटेवर भेटणारी तू
यातलं कोण खरं ?
भेटून सांग ना तू मला

माझ्या हाकेला कुठेही साद देणारी की
मी न बोलता, लिहिता ही मला समजणारी
ही प्रेमाची अजब गजब व्याख्या तू
समजून सांग ना तू मला

प्रेमाचं कोडं अजूनही गुंतत चाललय
उलगडलचं नाही मला
तू सोडवलं असेल हे कोडं
तर भेट अन खरंच सांग ना तू मला

                                                         ----नितीन खंडारे




Thursday, 16 November 2017

बाप माणूस - लेख

   बाप बाप असतो असं म्हणतात ते खरंच आहे.बाप समजायला जसा कठीण तसंच त्याच्यावर लिहिणं ही कठीण आहे. म्हणून की काय या बापावर लिहिलेलं सहसा फारसं आढळत नाही.
   आज हा विषय का? तर काही दिवसांपूर्वीच एका बापाला भेटलो. बापाला? अहो, माझ्या नाही. मी ज्याच्या विषयी बोलतो आहे तो बाप माणूसच आहे आपल्या क्षेत्रातला. पण त्या बरोबरच एका नऊ वर्षाच्या मुलाचाही. सर म्हणतो मी त्यांना आणि तेही सर म्हणतात मला. कळलं नाही ना का ते? पण जेव्हापण मी त्यांना भेटतो तेंव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो.... हसताय ना! अहो तो नव्हे जो महाराष्ट्राला पडलाय. तर "काय सर, कसे आहात?" हा प्रश्न. एकदा राहवलं नाही म्हणून मी त्यांना म्हटलं " सर, सर म्हणू नका . नितीन म्हणा." तेंव्हा ते म्हणाले," नितीन... ओह नितीन...सर." तेंव्हा ही ते सरच म्हणाले. कदाचित आपण लोकांची नावं विसारतो हे लोकांना कळू नये म्हणून की काय ते प्रत्येकाला सर म्हणत असावे बहुधा.
   तर अशा या बाप माणसाला त्यांच्या मुलासोबत भेटलो तेंव्हा नेहमीचा बाप-बेटा वाला अनुभव भेटला नाही. तर एक मित्र असलेला, मार्गदर्शक अन टीकाकार असलेला बाप पाहायला मिळाला. आपल्या मुलाला सांभाळून नाहीतर त्याला स्वतःलाच सांभाळायचं कसं हे सांगणारा बाप मी पहिल्यांदा बघितला. मी नाही तर तुझा गुंता तुलाच सोडवायचा आहे असं सांगणारा तो आणि वेळ प्रसंगी पाठीशी उभा राहणारा ही तोच. असा बाप पाहायला भेटला.
   "सर, बागबानच्या अमिताभ सारखं झालं तर..." अस मी सहजच विचारलं. तर सर मिश्किल हसत म्हणाले," त्याच्या सारखं... अगोदरच त्याला सांगितल बायको आली आणि पटलं नाही तर सरळ बाहेर व्हायचं. घर माझं आहे आणि त्यातलं तुला काही देत बसणार नाही. त्याला स्वतः च्या पायावर उभं करतोय अजून काय हवंय त्याला... काय रे बच्चा ..." असं दिलखुलास ते मुलासमोर बोलत होते. स्पष्ट बोलणारा,मित्र असणारा, मुलाच्या प्रत्येक फुटबॉल मॅचला हजर असणारा ह्या बापाचं आपल्या मुलाला मोठं कसं करायचं या गोल वर लक्ष ठाम होतं हे त्यावेळी मला दिसून आलं.
   अशीच चर्चा आमची सुरू असताना सरांच्या भाषेत , आमचे दुसरे सर ऑफिस मधून बाहेर आलेत. माझा चांगला मित्र आणि संगीतकार आणि एक बाप माणूस. कलेतला आणि दोन मुलींचा ही. अभिनय,नृत्य , संगीत या कलेबरोबरच इतर बरेच से ज्ञान अवगत असलेला... अजून कोणते ज्ञान ? भेटालं ना तर नक्की साक्षात्कार होईल त्या ज्ञानाचा आणि आपल्या ज्ञानाचा काही ही उपयोग नाही हेही सिद्ध होईल त्याच्या समोर अस वाटेल पण तसं काही नाही. पण खरंच कलेचं आणि जीवनाचं ज्ञान अन भान असलेला तो, एक बाप माणूस. आदर्श शिंदे बरोबर गाणी केलेला एक आदर्श असा नवरा आणि बापही. (टीप: आदर्श शिंदे आणि याचा फक्त गाण्यापुरता संबंध आहे. कृपया याचा चुकीचा अर्थ काढू नये.) तर असा हा आदर्श असा बाप. मुलींचे लाड करण्यापासून ते त्यांना वाईट सवयी पासून दूर ठेवणारा आणि तेव्हढाच त्यांच्या आईने रागावून ही नकळतच तिच्या, मुलींचे हट्ट पुरवणारा हा बाप. अनेक वेळा कामानिमित्त बाहेर असणारा , व्यस्त असूनही वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणारा, हा बाप माणूस. कुटुंबाचा ताल , सूर बिघडत असेल तर ताला सुरावर आणणारा बाप असं याच वर्णन करता येईल. खरंच इतकं तो सहज सोपं कसं करतो हे कळतच नाही.
   अशा या माझ्या आयुष्यातल्या बाप माणसांना मी जवळून अनुभवलंय. तसं माझ्या बापालाही. मी जन्मल्या पासून. काही अडचणींमुळे माझ्या आयुष्यातला सूर हलला होता आणि जीवनातला गोलही दूर होत चालला होता. पण आज मला सावरता येतंय. एक नवीन आयुष्य जगता येतंय. आज जो काही ही मी आहे आणि भविष्यात जे काही नाव कमावणार आहे त्यात त्यांचं श्रेय आहे , त्यांचाच मोलाचा वाटा आहे हे कायम स्वरूपी माझ्या मनात असेल.
                                                                                ----- नितीन खंडारे.

Tuesday, 14 November 2017

शोधतोय मी बालपण

शोधतोय मी बालपण
इकडे का तिकडे
कुठे हरवले ते लहानपण

लहानपणी हट्टाने
आईबाबांकडे मागत होतो
"हे नको, हे हवे, ते पण "

मोठे झालो अन
गुरफटून बसलोय आता
गमावून बसलोय ते क्षण

लहान होतो तेंव्हा
हव होत आपल्यातल मोठेपण
आता मोठेपणात विसरलोय ते आपलेपण

मित्र होते जिवलग भरपूर
पण मोठे झालो अन
हरवून बसलोय ते मित्रपण

न होता ताण जीवनात
न होता कोणता भारपण
होता जगण्यात तेंव्हा एक मोकळेपण

पक्षांसारखे मोकळ्या हवेत
नव्हती मोठी झेप पण उडत होतो सर्वजण
झेप घेण्याच्या नादात गमवाल ते आकाशपण

आता फक्त धावपळ
न राहिला आता कोणता
आपल्यांसाठी थोडासा वेळपण

ध्येय बदललंय आयुष्यातलं
तन मन जरी ठरलंय अडचण
तरी लक्ष्य आहे फक्तच धन

शोधतोय ते बालपण
सगळीकडे शोधलंय
पण सापडत नाही ते कुठेपण

पण जेंव्हा हात ठेवाल हृदयावर
तेंव्हा कळेल तुम्हालापण
दिल तो बच्चा है जी आजपण

खुलून जगा ,ठेवून मोकळे हे मन
बघा तिकडेच सापडेल तुम्हाला
तुमचं हक्काचं बालपण
                                             ----नितीन खंडारे






Tuesday, 7 November 2017

व्यसनमुक्त अभियान

विना जाहिरातीची
असे कसे विकले जातात धुम्रपान अन मद्यपान
बडी मिजाज यांची
असतात या भावांचे नेहमीच चढे भाव अन ताठ मान
घेणाऱ्याला पर्वा नाही यांच्या दराची
महागाईची ना  कटकट वाटत अन ना कसला ताण
कश मारताना सिगारेटची
फुस्फुसाचा श्वास घोटला तरी वाटते याची शान
मजा वाटते या धुराची
पण या धुरात हरवतो आपण आपल्या आरोग्याच भान
क्रेझ ऐकली असेल 20-20 ची
पण काहींचा 30,60 अन 90 च्या खेळात असतो जीव की प्राण
मग चालताना होते तारांबळ त्यांची
होतो सूर्याभोवती पृथ्वी फिरते असा साक्षात्कार त्या घोटात छान
आरोग्याला हानिकारकाची
चेतावणी असूनही आपले त्यावरच असते ध्यान
मित्र हो तब्येत नाही तुमची
आहे पूर्ण कुटुंबाची म्हणून छेडा तुमच्या पासून व्यसनमुक्त अभियान
                          
                                                                 ---नितीन खंडारे




Monday, 30 October 2017

तू विसरलीस कुठे होतीस मला आठवायला

तू विसरलीस कुठे होतीस
मला आठवायला
तेंव्हा वाट पहात उभी असायचीस
पण वेळ नव्हता साधा
तुला थांबायला
होत भरपूर बोलायचं तुला
पण शब्द सुचत नव्हते
त्या क्षणाला
मनात बरच दडवलं होतं तू
पण धाडस नव्हतं तुझ्यात
मन मोकळ करायला
त्यात सतत नजर शोधत होती तुझी
पण सापडत नव्हतं
आली होती जे शोधायला
पण भेटल्यावर मी मात्र
लक्ष वेधण्यासाठी दुर्लक्ष करत होती तू
माझ्या असण्याला
नेहमीचच तुझ हे वागण पाहून
बदललं मी स्वतःला
आणि स्वतःच लागलो मी
तुला आठवायला
वाट पहात उभी असायचीस तू
तेंव्हा मुद्दाम थांबायचो
तुला सोबत द्यायला
तुला सुचत नव्हत पण बोलायचं होत भरपूर
म्हणून मीच होतो बोलत
तुला शब्द सुचवायला
त्यावेळी मनात बरच काही होत तुझ्या
म्हणून मी वाट झालो ती
तुझ मन मोकळ व्हायला
सापडत नव्हतो जेंव्हा डोळ्यात तुझ्या
तेंव्हा मी यायचो समोर
तुझ्या नजरेतला मी शोधायला
काळजी आहे तुझी, जगात कुठे ही तू असताना
गरज नाही सखी तुला
लक्ष माझं वेधायला
तू विसरलीस कुठे होती
मला आठवायला
आज हि येत हसू ओठी
नकळतच तुला
मला आठवताना
तुझा हा विसरण्याचा सखे
ओळखून आहे मी बहाणा
फक्त विसरतेस तू मला
मी समोर असताना
पण न विसरता आठवते तू मला
सखी मी नसताना
मला विचारशील तर
मनातच आहेस तू
म्हणून विसरतो कुठे मी
तुला आठवायला
पण आजही तू सांगतेस
न विसरता मला
"सॉरी,हा, विसरले मी
तुला सांगायला "
                                         ----नितीन खंडारे




Saturday, 28 October 2017

सोशल मिडिया ---सोसलं तेव्हढ वापरा

ट्विटर , फेसबुक च्या जगात 
हरवलोय आपण नकळतच 
गूगलवर शोध घेतोय खूपच 
पण सापडत नाही आपणच 
व्हाट्सअपच खूळ डोक्यात 
म्हणून लक्ष असत सतत त्यातच 
कोणी काय लिहिलंय आज 
अर्धा वेळ खपतो त्यातच 
मित्र बनवले त्यावर,खूप अप्रूप त्याच  
पण असतात का हो  मित्र ते आपले खरंच ?
त्या जगात हरवून सतत 
विसरलोय का आपले आप्तच ?
काढतो सेल्फी आपण हसत,पाऊट दाखवत 
बघणारा असतो कॅमेरा फक्त,दुसरा नसतो कोणच 
एकटेपण त्यात असतं पण आपल्याला नाही दिसत 
कारण फुलाहून वेगळी पाकळी भासते या जगातच 
Virtual जग आहे ते 
नव्हे त्यात खऱ्या जगाचा टच 
मोबाईल दिवसभर असतो शेजारी जवळच 
पण मायेचा टच भेटतो कोण्या आपल्यातच 
समजू नका तंत्रज्ञानाच्या विरुद्ध आहे मी कधीच 
करू योग्य वापर त्याचा,संयम ठेवून मनावरच 
कारण जशी अणुऊर्जेचं तंत्रज्ञान देते वीज 
तशीच घडवून आणू शकते विश्वात विनाश तीच 
म्हणून केंव्हा ,कुठे कस ते धन ज्ञानाच वापरायच 
ठरवायचय सदविवेक बुद्धीने फक्त आपले आपणच 
                                                                           ---नितीन खंडारे 

Thursday, 26 October 2017

एक रेल्वेवरचा पूल

रोजचा दिवस अन रोजचीच धावपळ
होती सुरू वर्दळ माझ्या अंगाखांद्यावर,

गप्पाटप्पा ऐकत होतो अशाच अवखळ
की कसा देश चालतोय एका तोंडाच्या वाफेवर,

GST,नोटबंदी अशा कडू औषधाचा प्रयोग कसा फसला,
केला कसा भ्रमनिरास त्याने ऐकू येत होत कानावर

ऐकलं होत कि कायदा चांगला पण अतिघाई,मनमानीने केला घोळ ,
म्हणून अर्थव्यवस्था घसरली ,परिणाम झाला नोकरी उद्योग धंद्यावर

सुरुवातीला मेक इन इंडिया ऐकून बर वाटल हो  थोडावेळ ,
पण त्यातही बाहेरच्याच कंपन्या, काय बोलू या गुंतवणुकीवर ?

आजही बघतोय, स्त्रियांच्या सुरक्षेत ठरतोय आपण कुचकामी भासतो दुर्बल
पण गाईंच्या रक्षणासाठी कुठून येतात हो हे गौरक्षक एवढ्या तत्पर ?

बुलेट प्रूफच जॅकेट सैनिकांना भेटो न भेटो याची कोणाला पर्वा ना आठवण
पण मोजक्या लोकांसाठी असलेल्या बुलेट ट्रेनच कौतुक होतं सर्वांच्या ओठावर

नवनवीन तंत्रज्ञान यावे यात कधीही नव्हत दुमत कोणाचही यावर
पण कोणासाठी,कशासाठी अन कोणत्या स्वार्थासाठी जीवघेण्या किमतीवर ?

मित्रो , फक्त आपल्या मनची बात बरोबर असच होत आलय सर्ववेळ
पण कधी घेतला का त्यांनी कानोसा सर्वसामन्यांच्या मनातील समस्यांवर

अशाच रोजच्या गोष्टी ऐकत होतो त्यादिवशी पण
मरमर के जीना है, सब चलता है येत होत हे कानावर

पण त्यादिवशी अचानक अफवेने ,बेशिस्तीने झाली गडबड
पूल कोसळला म्हणून माजला कल्लोळ , झाली गर्दी अनावर

सारे झाले सैरभैर , पळत इकडे तिकडे , उडाला एकच गोंधळ
जीव वाचवण्याच्या खेळात दबले गेले , रचले गेले माणसांचे थरावर थर

कुणी गुदमरून तर कोणी अडकून फसले तर काही जगण्याच्या प्रयत्नात झाले निष्फळ
पण मी काही करू शकत नव्हतो , बघत होतो फक्त सगळ परिस्थितीसमोर होऊन हतबल

नेहमी श्वास गुदमरून,चेंगरून,जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे ,जगणारे ते
त्यादिवशी चेंगरून गुदमरून जीव गमावून निघून गेले अखेरच्या प्रवासावर 

तो प्रसंग आणि जीव गमावणाऱ्यांना आठवून आजही थरथरतोय हा पूल पायापासून
विचार केलाय का कधी,काय ओढवले असेल त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर ?

त्यादिवशी पूल कोसळला अशी पसरली होती अफवा एका क्षणात  केवळ
पण खरच कोसळलो मी मनाने,खचलो गेलो पाहून मी हा दुर्देवी प्रसंग घडल्यावर

त्यादिवशी मेलेल्यांच्या वरच लोणी खावून, माणुसकीला लाजवून गेले काहीजण
पण काहींनी जपली माणुसकी, देवून हात , करून मात त्या आलेल्या संकटावर

वाईट वाटलं ,या घटनेची पण झाली केवळ राजनीती,विसरून तो भयावह क्षण
फक्त घोषणा आणि आश्वासनच पदरी पडली हाती एवढी दुर्घटना घडून गेल्यावर

माझ म्हणण एकच,
स्वप्न नाहीत मोठी सर्व सामन्यांची , एकवेळ जाणून घ्या त्याचं मन
द्या त्यांना गरजेच्या सुविधा बनवा त्यांच जीवन प्रवास थोडफार सुखकर
काय बोलताय , घ्या ना  थोड हे मनावर ...........

पण सर्व विसरून पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने झाली माझ्या अंगाखांद्यावर धावपळ
प्रश्न पडला मला, विसरून सगळे असे कसे चलता है म्हणत चाललाय हा मुंबईकर ?

अरे ऐक मुंबईकर,
एकदा तरी आवाज उठव या विरुद्ध स्वतःसाठी काढून थोडीशी सवड
दबलेली भावना , राग यांना कधीतरी वाट देवून मोकळी तर तू कर

किती दिवस , तडजोड करत ,चलता है म्हणत, मरमरून जगत तू राहणार
आता तरी सावर
स्वतःला नको पण या अन्यायाला ,भ्रष्टाचाराला,असंवेदनशील नेत्यांना
घालना कधीतरी आवर.....
                                                                                                                     
                                                                                                                    ---नितीन खंडारे

















Monday, 23 October 2017

तिला भेटल्यावर

माहित आहे मला ,
कधीतरी ती गोष्ट येईल ओठावर
पण शब्द अडखळतात ,
तिला बघितल्यावर
आणि कधीतरी ते शब्द चुकवताना
रस्ता बदलतो मी ,
ती भेटल्यावर
सहज सोपी वाटणारी ती गोष्ट
विसरतो , गडबडतो मी
तिला पाहिल्यावर
नव्हे सोपी मनातली ती गोष्ट ,
ती तर आहे एक
दुधारी तलवार
जी सांगितल्याशिवाय
नाही राहवणार
पण सांगितल्यावर
मैत्री गमवायची भीती
सतत सलत राहणार
म्हणून या द्विधा स्थितीत असणाऱ्या,
मनाला आवरतो मी ,
प्रत्येक वळणावर
आणि या ओठावर
रेंगाळणाऱ्या शब्दांना
मी थांबवतो  या अटीवर
तिला सांगूया कधीतरी
योग्य अशी वेळ आल्यावर
कधीतरी सांगेल मनातील ती गोष्ट
तिला भेटल्यावर......
तिला भेटल्यावर.......
                                                     -----नितीन खंडारे

Saturday, 21 October 2017

संधी

वेळ नाही हे सतत कारण
देत होतो मी तिला
पण वेळ थांबत नाही हेच
ठावूक नव्हत मला
सवड मिळाली म्हणून जेंव्हा
आलो तिला भेटायला
तेंव्हा मात्र वेळ नव्हता तिला
साध मला आठवायला ?
वेळ ती गेली होती
तिला मी कधी न दिलेला
ती वेळ परत यावी
वाटत आजही या मनाला
कदाचित वेगळीच वेळ असती
आज माझ्या या आयुष्याला
जर मी असतो तिच्याबरोबर
प्रत्येक महत्त्वाच्या वेळेला
मग तीही असती
मी ही असतो
आजही सोबतीला
पण आता ,
वेळ थांबत नाही म्हणून
निघतोय नवीन प्रवासाला
सतत शोधात चाललोय
त्या संधीला , त्या योग्य वेळेला
भेटेल  ती आणि देईल
कलाटणी माझ्या आयुष्याला
                                             -----नितीन खंडारे



Wednesday, 18 October 2017

कोजागिरीचा चंद्र तू, का म्हणावे मी तुला ?

कोजागिरीचा चंद्र तू,
का म्हणावे मी तुला ?
आईचा भाऊ चंद्र तो,
मामा त्याचा तेंव्हाच झाला !
तरी मग ,
तुलना का करावी त्याच्याशी ,
मामा बोलतो मी ज्याला ?
नको वाटते त्याची सावली ,
तुझ्यावर पडावीशी मला .

"का नको ?" म्हणाली ती
सखी माझी हळुवार ,
मी म्हणालो ,
"डोळ्यांवरचा विचारांचा चष्मा सरकवून ,
   त्या चंद्राकडे नीट बघ मेरे यार...."

किती तरी दिसतील डाग तुला ,
पण नाही जिवंतपणा त्यावर
पण अनुभवायचा तुझा जिवंतपणा ,
हा बोलकेपणा मला आयुष्यभर
अन डाग अच्छे म्हटले तरी ,
डाग नको हवेत कोणते ,
मला तुझ्या नितळ मनावर
कोजागिरीचा चंद्र तू ,
का म्हणावे सांग ना यावर ?

कलेकलेने सुखदुःखाच्या आकाशात ,
पूर्ण साथ न देणारा हा फिरतो चंद्राकार
तसा भास नको पण साथ हवी तुझीच  ,
नेहमी प्रवासात या अनोळख्या वाटेवर
कोजागिरीचा चंद्र तू ,
का म्हणावे सांग ना या जीवन वळणावर ?

यार, १/६ वजन कमी भरतं ,
माहित आहे का त्या चंद्रावर ,
पण वजन तुझं नेहमी वाढू दे ,
तुझ्या कर्तृत्वाचं या भूमीवर
तसा ही तो चंद्र नसे स्वयंप्रकाशी ,
असे त्यासाठी अवलंबून तो सूर्यावर
पण स्वाभिमानी,स्वावलंबी तू शक्ती ,
यशप्रकाश पसरू दे तुझा या जगावर
बघ , नक्कीच  तू ठसा उमटवशील
माहित आहे मला या जगाच्या पाटीवर
मग , ठरव तूच यार ,
कोजागिरीचा चंद्र तू ,
असे म्हणावे का मी तुला जीवनभर ?
                                                       ------नितीन खंडारे 

तुतारी--- केशव सुत

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदूनि टाकीन सगळी गगणे
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मज आणुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारिता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल ?

रूढी ,जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती हि हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला !
तुतारीने ह्या सावध व्हा तर !

चमत्कार ! ते पुराण  तेथुनि
सुंदर , सोज्वळ गोड मोठे
अलीकडे ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खां लागूनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध ! ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवुनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा ?
विक्रम काही करा , चला तर !

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे ! स्त्रैण न व्हा तर !

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनिया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो ! या त्वरा करा रे !
समतेचा ध्वज उंच धरा रे !
नीतीची द्वाही पसरा रे !
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी , मानव
नसे नियमनासाठी , जाणा
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारूनी दे देऊनी बाणा
मिरवा निज ओजाचा अभिनव !

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे !
उन्नतीचा ध्वज उंच धरा रे !
वीरांनो ! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर हर !

पूर्वी पासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रती दानव फार माजती
देवावर झेंडा मिरविती !
देवांच्या मदतीस चला तर !

                                           ----- केशवसुत


                                          कवितेतल्या काही आवडलेल्या ओळी आणि त्यांचा अर्थ 
   
     "चमत्कार ते पुराण तेथुनि.............धिक्कार अशा मूर्खां लागूनी " अलीकडे  गोड बोलून , चमत्काराच्या बाता ठोकून  खोटे लोक आपली पोटं भरतायत आणि अशा मुर्खांच्या नादी लागणाऱ्या मूर्खांचाही त्यांनी इथे धिक्कार केला आहे. एवढं आपल्या विचारवंतांनी समजवूनही अजूनही आपण बाबांच्या मोठ्या कांड लीला ला बळी पडतोय. ही खूप मोठी आपल्या आजच्या समाजाची शोकांतिका आहे
     "धर्माचे माजवून अवडंबर.........."   धर्माचा वापर करून आपण नीती , न्याय आणि प्रगतीला अडथळे निर्माण करत आहोत. धर्माचा  लोकांना एकत्र आणण्यासाठी वापर  न करता लोकांना विभागण्यात , त्यांच्यात दरी निर्माण करण्यासाठी वापरत आहोत. आज आपण भोवताली हे अनुभवत आहोत.
" नियमन मनुजासाठी , मानव , नसे नियमासाठी जाणा..........." नियम माणसासाठी आहेत माणूस नियमासाठी नाही. नियम माणसासाठी त्याच्या सोयीसाठी असतात . पण कधी कधी नियमावर जास्त जोर देता देता  माणसांच्या गैरसोयीच कारण हि तेच नियम ठरतात.याच जिवंत उदाहरण सध्या आपण अनुभवत आहोत. नियम/कायदा  लवकर लागू करण्याच्या नादात लोकांची गैरसोय झाली . नुकसान झालं. चांगला नियम असूनही यतो लोकांपर्यंत पोहोचला नाही.
     "जुने जाऊ द्या मरणा लागूंनी , जाळुनी किंवा पुरुनी टाका" . पण  अजूनही आपण जुन्या अनिष्ट  रूढी परंपरा यांना चिकटून आहोत. त्यांचा  त्याग करून , यांना जाळून दूरदृष्टी ठेवून खांद्याला खांदा लावून ,बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची कास धरून आपल्याला पुढे जायला हवे. असे मत कवीने व्यक्त केले आहे.
     शांत बसून मेद म्हणजे चरबी वाढवू नका. सतत न थकता काम करा. रोज कालच्या पेक्षा आज जोमाने काम करा. आणि आयुष्य सुंदर बनवा.  समता आणण्याचा आणि समाजात असलेल्या वाईट प्रवुत्तीवर मात करण्यासाठी एकत्र येऊन  त्याविरुद्ध लढण्याचं आव्हान येथे कवितेत कवीने केले आहे.
    अशाप्रकारे अंधश्रद्धा , जुन्या अनिष्ट प्रथेविरुद्ध , चालीरीती विरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी , समाजातील नीतिमत्ता जपण्यासाठी , कर्म प्रधान होऊन दूरदृष्टी ठेवून एक नवा समता प्रधान समाज निर्मितीसाठी एक रणशिंग , तुतारी कवीने कवितेद्वारे फुंकली आहे.  
     आजच्या परिस्थितीला हि कविता समर्पक  वाटते. अजूनही आपण आपल्या थोर विचारवंतांचे विचार आपल्यात, या समाजात रुजवण्यात कमी पडलो आहे हे ही प्रकर्षाने जाणवते. चला , तर मग या कवितेतील ऊर्जा घेऊन आपण आपल्या समाज सुधारकांना अपेक्षित असा समाज घडवूया.
.

Wednesday, 11 October 2017

गिफ्ट अ स्माईल

     मराठी ब्लॉग आणि इंग्रजी शीर्षक? हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. पण त्याला कारण ही तसेच आहे.
     तर रविवारी मला काही करून मित्राला भेटायचं होतं आणि तसा संदेश ही मी व्हाट्सअप्प वर पाठवला. लगेचच त्याचा कॉल आला. " अरे कुठे आहेस ? जमलं तर ये ना नेरुळ मध्ये दान पारमिताच्या गायनाच्या प्राथमिक स्पर्धेला. इथे परीक्षक म्हणून काम पाहतोय मी. अरे ये."
     मी त्या ठिकाणी जाणारच त्यामुळे मी जाणार की नाही हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. पण हा प्रश्न नक्की पडला असेल की दान पारमिता आणि गायनाची स्पर्धा हे आहे काय?
     दान पारमिता ही एक सेवाभावी संस्था आहे. सेवा भावी संस्था? हो सेवाभावी संस्था. मला माहित आहे की सध्या या देशात दुष्काळामुळे पिकत नाही पण तरी एका पिकाचं उत्पादन अमाप आहे , ते म्हणजे सेवाभावी संस्थाचं. इकडे आधार कार्डचा फायदा सामान्य माणसाला होवो न होवो पण सेवाभावी संस्थाचा आधार घेऊन नेता ते अभिनेता पासून सगळेच दानशूर असल्याचा आव आणून आपल्या प्रसिद्धीला कळस मात्र चढवतात. "अरे किती चांगलं काम करतात. नका करू रे ."अशी बोलण्याची वेळ कधी तरी  आपल्यावर येणारच आहे, यांचा हा मोठा खोटा दिखाऊपणा पाहून आणखी काय?
     पण त्यातही काही अपवाद आहेत. त्यातली ही एक संस्था. आता तुम्ही बोलाल मी यांचा प्रचार करतो. पण मी काही कोणता मोठा प्रसिद्ध व्यक्ती नाही जो मी बोलेल आणि तुम्ही डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवालं. हो ना. मग असं असेल तर कोणावरही विश्वास ठेवू नका, डोळे झाकून. भलेही तो मी असो की कोणता मोठा व्यक्ती.
     असो. तर मी त्या पत्त्यावर पोहोचलो आणि माझा मित्रच परीक्षक असल्यामुळे मला ऑडिशन प्रत्येक्षात बघण्याचा अनुभव मिळाला.
     अनुभव आणि वयाचा संबंध नसतो असं काही जण म्हणतात. आणि त्या स्पर्धेत लहान मुलांची गायनाची प्रतिभा पाहून याचा प्रत्येय आला. काही जण गाण्यात भल्या भल्यांना ऐकणार नाहीत असे होते तर त्यात एक लहानगा असा होता जो परिक्षकांनाही ऐकणारा नव्हता. परीक्षकाने थांबवल्यानंतर सुद्धा हा चिमुरडा गात राहिला तेही गाणं पूर्ण ऐकवून जाणारच याच एका जिद्दीने . लहान मुलं जिद्दी नसणार तर कोण असणार ?
     या जिद्दी शब्दावरून आठवलं. आठवलं काय तर हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. अहो मुलंच जिद्दी असतात असं आपल्याला वाटतं. पण जिद्दीपणा अंगात असावा लागतो तेही आयुष्य अर्थपूर्ण बनवायला.असेच जिद्दी  दिव्यांग स्पर्धक डोंबिवली , विरार या सारख्या ठिकाणावरून आपलं गाणं सादर करायला आले होते. आणि  मला वाटतं गाणं सादर करणं हेच त्यांचं स्वप्न होतं . गाणं झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान बघण्यासारखा होता. त्यावेळी त्यांच्या जिद्दीला सलाम करावसा वाटलाच पण त्यांच्या गोड गळ्यालाही दाद द्यावीशी वाटली आणि ती मी दिलीही.
     आपण थोड्याश्या अडचणींनी बिथरून जातो. घाबरतो . पण हे पाय नसून आयुष्यात सतत पुढे चालत राहतात. हात नसून मोठी आव्हान पेलून जातात. दृष्टी नसूनही आयुष्यात दूरदृष्टी ठेवतात. हे स्पर्धक फक्त जिद्द मनात रुजवून नाही गेलेत तर शिकवूनही गेलेत जीवन जगणंही .
     जीवन जगायचं तर आताच जगा . नंतर वय झाल्यावर जमणार नाहीत अशा म्हणणाऱ्या लोकांना खोटं ठरवणारे चिरतरुण स्पर्धक ही इथेच भेटले. गाणी गाण्याच्या आनंदाबरोबरच जीवन जगण्याचा आनंद ही ते देऊन गेलेत. आजच्या युवकांसाठी प्रेरक ठरतील असेच ते होते.
     पण युवा स्पर्धक ही गायनाच्या बाबतीत मागे नव्हते . त्यांच्यातली धडपड , उत्साह आणि  त्यांच्यातली नव ऊर्जा दिसत होती. प्रत्येक स्पर्धक इथून आनंदी भावाने गेला. बघायला गेलं तर ही स्पर्धा लक्षात राहील अशीच होती. नक्कीच हि स्पर्धा पुढच्या फेरीत हे स्पर्धक नव्या उंचीवर नेतील यात शंका नाही.
     स्पर्धक संपले आणि स्पर्धा संपली तेंव्हा मी आणि इतर मंडळी निवांत झालो. दिवसभरात घडलेले प्रसंग आठवून माझ्या चेहऱ्यावर नकळत एक हलकंसं हसू आलं . मनात आनंद आणि समाधानाचे भाव आलेत. हाच आनंद आणि समाधान मी दिवसभर धडपड करून स्पर्धा यशस्वी करणाऱ्या दान पारमिताच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर पहिला. हाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहता पाहता माझी नजर दान पारमिताच्या ब्रीद वाक्यावर गेली " गिफ्ट अ स्माईल ."
     गिफ्ट म्हणजे भेट. ती पैशाचीच असते असं नाही . तर आनंद देऊन आनंद घेण्याचीही असते. कोणाच्या चेहऱ्यावर आनंद बघणं किती सुखद असतं नाही का ? आणि हाच आनंद आपल्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आलाय याच समाधान काही औरच असतं. नाही का? स्माईल गिफ्ट दिल्यामुळे स्माईलच रिटर्न गिफ्ट म्हणून मिळतं हे त्यावेळी अनुभवलं.
     पुढच्यावेळी जर कोणाला भेटला तर त्यालाही द्या गिफ्ट म्हणून एक स्माईल. ती मोफत आहे त्यामुळे कंजुषी दाखवू नका.
                                                                                                                     -----नितीन खंडारे

Monday, 9 October 2017

प्रेम म्हणजे ? भाग २ (मित्राचं उत्तर )

मित्र उवाच ,
        प्रेम म्हणजे ,
एकमेकांची जन्मभराची साथ ,
संकटाच्या काळात ,
एकमेकांना सावरण्यासाठी ,
दिलेला धीराचा हात ,
अडचणींवर करत मात ,
घालायचा असतो संसाराचा घाट ,
रुसवे फुगवे , सावरत ,
एकमेकांच्या विश्वासावर ,
रचायचा असतो हा ,
संसाराचा परिपाट ,
संसाराची दिशा अन दशा ,
यात असतो दोघांचा हात,
संसार रुपी रथाला दाखवतात ,
फक्त हेच चांगली वाट ,
मित्रा ,
अशी हि आहे ,
प्रेमाची दुनियादारी ,
तुझी अजूनही आहे मात्र ,
याबतीत पाटी कोरी ,
मी म्हणालो ,
प्रेमाची पाटी अजून ,
जरी असली कोरी ,
पण कधी तरी सुरु होईल ना यार ,
मेरी भी प्यार वाली लव्ह स्टोरी ......
                                                     -नितीन खंडारे

प्रेम म्हणजे? भाग १

प्रेम कधी होत नाही ठरवून ,
प्रेम करायचं नाही म्हटलं तरी ,
हा योग येतो जुळून ,
प्रेमाचं हे समीकरण कधी ,
उलगडलंच नाही ,
प्रेम म्हणजे काय असतं ,
हे मला कळलंच नाही ,
कोणासाठी प्रेम म्हणजे TIME PASS ,
तर कोणासाठी नव्या जीवनाचा प्रवास ,
प्रत्येकाला हवा हवासा वाटतो ,
हा प्रेमाचा सहवास ,
या प्रेमात पडायला गरुत्वाकर्षण हि ,
नसतो जबाबदार ,
तरी असा कसा जुळून येतो ,फुलतो ,
हा प्रेमाचा बाजार ,
करंट FLOW करतो ,
पॉसिटीव्ह कडून निगेटिव्ह कडे जर ,
असाच नसेल ना प्रेमाचा हा ज्वर ,
मॅग्नेट मध्ये नेहमी ATTRACT करतो ,
S पोल कडे N पोल ,
असाच तर नसेल ना प्रेमाचा झोल ,
घेतला मी जर KBC सारखा ऑडियन्स POLL ,
तर कळेल का मला प्रेमाचा झोल ,
अशा किती तरी प्रश्नांचा होता ,
डोक्यात घोळ ,
मित्राच्या उत्तराने प्रेमाला भेटला ,
एक आगळा वेगळा मोड ,
मिळाली त्याला 'संसार' सारख्या ,
सिरीयस शब्दाची जोड ........
                                             -नितीन खंडारे 

सखी

सखी , तुझे निरागस , खोडकर डोळे
तरी तुझ्या पापण्या ओलावलेल्या का वाटतात ?
तुझे सुंदर स्मित  हसू ,
तरी पण त्यामागे वेदना का जाणवतात ?
दिसते जरी तू वरून बिनधास्त , मोकळी,
तरी पण असं का भासतं ,
काहीतरी दडवलय तू मनात ?

सखी , तुझ्या डोळ्यातल्या ओल्या पापण्यांनी ,
मन जातं गहिवरून ,
तुझ्या स्मित हास्यामागील वेदनांनी ,
का मन हेलावतंय आतून ?

सखी, तू जशी आहेस ,
तशीच आहेस ,
छान , हळवी
कोणासाठी बदलू नकोस ,
कोणासारखी होऊ नकोस ,
तू तुझीच ओळख बन
आणि जगाच्या रंगभूमीवर या ,
वेगळस एक नाव कोर ........
                                           -नितीन खंडारे